बुधवार, १५ मे, २०१३


कथेचा विषय (subject)
A film cannot be any good if it isn’t well written.


ERNEST LEHMAN  
बर्याचदा आपणास कथा सापडते पण खुपदा संपूर्ण कथा गवसत नाही. एखादा विषय आपणास भावतो. उदा. लहान मुलांच्या शिक्षण संबधीच्या समस्या (तारे जमिन पर ), किंवा सरळ सरळ कथा मिळते लगान माफी मिळवण्या साठी क्रिकेट मैच (लगान)
कथा नक्की झाली तर आपणास त्या संबधी संशोधन करावे लागते, आपल्या कथेचा काळ कोणता ? उदा. स्वातंत्र पूर्वीचा ? पेशवे कालीन ? इ. त्या लोकांची भाषा, बोलण्याची लकब, पेहराव इ. बाबतीत सखोल  माहिती मिळवावी लागते. कथा सर्वथा काल्पनिक असेल तर ती भाषा कशी असेल ? वेशभूषा कशी असेल ? घरे फर्निचर शोभेच्या वस्तू, वाहने काय काय शोधावे लागेल हि यादी खूप वाढत जाणारी असते.
पण विषय निश्चिती अगोदर केली तर आपणास जरा जास्त संशोधन करावे लागते. त्या विषयाच्या अनुषंगाने काय काय लिखाण झाले  आहे ? कोणत्या फिल्म बनल्या आहेत ? त्या विषयीच्या विविध लेखांचा अभ्यास ? त्या विषयातील तज्ञांच्या मुलाखती घेणे, त्या अनुसार कथेची अथवा प्रथम पात्राची (Hero) निर्मिती करावी लागते.
एकंदर विषयातून कथा किंवा सरळ कथा मिळाली म्हणजे काम पूर्ण झाले असे समजू नये कारण आता खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात झालेली असते. स्क्रीन रायटर चे काम फक्त डायलॉग आणि त्यांच्या कृती (activity) लिहिणे नसते. स्क्रीन रायटर ला संपूर्ण एकसंध कथेचे वेगवेगळे तुकडे करावयाचे असतात. कोणकोणत्या ठिकाणी हि कथा घडते त्यानुसार ! कोणकोणत्या वेळेला हि कथा घडते त्या नुसार ! त्या ठिकाणांची (locations) सखोल माहिती निर्माण करावी लागते. उदा. बगंला आहे तर त्यात असणारे फर्निचर, जिना, तिथली श्रीमंती, ( असलेली किंवा नसलेली) तिथले कारपेट, दरवाजा, खिडक्या इ. सारे डीटेल्स निर्माण करावे लागतात. कोणत्या वेळेला आपले पात्र (character) जिन्यात असेल ? कधी खिडकीत असेल ? त्याच्यावर प्रकाश कसा किती असेल ? आजूबाजूला कोणते आवाज येत असतील ? कोणत्या ठिकाणी तो कसा बसेल ? कसा उठेल ? धावेल ? काय काय करेल ? आणि ते प्रेक्षकांना कसे दिसेल ? चित्रपट लेखकाला हे सारे सुसंगत रीतीने मांडावयाचे असते.
याचा सर्वचा अर्थ असा नाही कि स्क्रीन रायटरला उत्कृष्ट sound engineer, Cinematographer, set designer, किंवा Electrician  असण आवश्यक आहे. स्क्रीन रायटरला डायरेक्टर पेक्षा जास्त नॉलेज असायला हवं की लीडिंग एक्टरच कौशल्य असायला हव ? तर असं नाहीये, पण स्क्रीन रायटरला हे सगळे कसे होईल ? जमेल कि नाही याचा अंदाज असायला हवा. आपण जे लिहितो आहोत ते पडद्यावर आणण्या साठी काय करावे लागेल ?  ते कसे होईल हे समजलेले असले तर आपण ते ठाम पणे लिहू शकतो ! अमुक घटना किंवा दृश्य दाखवता येणार नाही ते टाळून वेगळ्या प्रकारे कसे दाखवता येईल यावर आपण विचार करू शकतो.

कथा  (story)
एक राजा होता ! तो खूप शूर होता आणि त्याच खूप मोठ राज्य होत. त्याची एक राणी होती ती खूप सुंदर होती. त्या दोघांची एक राजकन्या होती. राजकन्या खूप सुंदर आणि हुशार होती. एकदा शिकार करतांना तिची शेजारच्या देशाच्या राजकुमारा शी अचानक भेट घडली. राजकुमार राजबिंडा आणि देखणा होता. दोघे एकमेका कडे आकर्षित झाले. दोघांमध्ये प्रेम निर्माण झाले. त्या दोघांचा विवाह ठरला. पण राक्षसाने राजकन्येला पळवून नेले. राजकुमार तिच्या शोधात निघाला. राक्षस खूप शक्तिशाली आणि जादूटोणा करणारा होता. राजकुमार त्या बलाढ्य राक्षसाशी कसा सामना करेल अशी चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली. पण राजकुमाराने आपल्या कौशल्य आणि शक्तीच्या बळावर राक्षसाचा वध केला आणि राजकन्येला सोडवून आणले. नंतर दोघांचा विवाह झाला. The End.
समजा अशी आपली कथा आहे. खर पाहता हीच एकमेव कथा आहे. ह्या कथेत राजा राणी राजकन्या आणि राजकुमार बदलत असतात. राजा प्राण राक्षस प्रेमनाथ राजकन्या डिम्पल कपाडिया आणि राजकुमार ऋषी कपूर  असला तर हि बॉबी ची कथा होते आणि बदलले सनी देओल इ. केले तर बेताब ची होईल. आणि आपण आपल्या कल्पनेच्या  सहाय्याने ह्या राजा राणी राजकन्या राजकुमार आणि राक्षस ह्याच्यात आमुलाग्र बदल केला. हे सारे कुठल्याश्या दुसऱ्या ग्रहावरचे जीव आहेत असे दाखवले तर आपली कथा एकदम आगळी वेगळी होते.
ह्या एका दृष्टीने लेखकाला स्वातंत्र अफाट आहे. जे न देखे रवि ते देखे कवी असे म्हटलेले आहे ते खोटे नाही. आणि आताश्या डिजिटल क्रांती झालेली आहे. तुम्ही कल्पना कराल ते दाखवता येते. आपण ह्या अफाट स्वातंत्र चा उपयोग करू जातांना भरकटतो. खूप काही काही दाखवावे ह्या हव्यासापोटी कथे मधली भावनिकता जपायला विसरतो. आताश्या येणाऱ्या चित्रपटातून हे सारखे जाणवते. टेक्नोलॉजी काहीशी अंगावर येते. खूप भव्य दिव्य सेटिंग,कॅमेरयाच्या खूप खालीवर होणाऱ्या हालचाली.  डोळे दिपवणारा प्रकाश ……… हे सगळ खूप होत आणि ज्या भावनेने आपल मन भिजायला हवं ते कोरडाच राहत ! सगळ छान असूनही ते भावात नाही. असा का होत तर ह्याच कारण आपण व्यर्थ त्या गोष्टींना भाळलो आणि आपली गोष्ट परिणाम कारक करण्यासाठी फक्त टेक्नोलॉजी वर विसंबून राहिलो. आपल्या व्यक्तिरेखा कमजोर राहिल्या. पर्यायाने आपली कथा सशक्त होवू शकली नाही.
ह्याचा अर्थ असा मुळीच नाही कि टेक्नोलॉजी काहीच कामाची नाही. ती खूप उपयोगाची आहेच. पण ती कथेच्या भावानिकतेला बळ देणारी व्हायला हवी. उत्कृष्ट सिनेमा साठी नेहमी कथा जास्त महत्वाची आहे टेक्नोलॉजी त्या खालोखाल. कथेच्या प्रसंगांना, व्यक्तिरेखांना उठाव देण्यासाठी टेक्नोलॉजी चा यथोचित वापर अवश्य करावा. तसेच टेक्नोलॉजी चा उचित वापर करण्यासाठी कथेमध्ये नाविन्य आणावे जे परिणाम कारक होईल. याचे उत्तम उदाहरण आहे हॉलीवूड चा “अवतार” ! विचार करा आपल्या किती  भारतीय सिनेमाची कथा अशी होती
“ हिरो एखाद्या राज्यात किंवा हवेलीत किंवा स्मगलरच्या गन्ग मध्ये शिरतो काहीतरी महत्वाचे  चोरण्या साठी ! पण तेथील मुलीच्या प्रेमात असा अडकतो कि तिच्याच साठी आपल्या  पूर्वीच्या सहकार्यांशी लढतो.” हि कथा अवतार ह्या चित्रपटातून किती नाविन्य पूर्ण रीतीने, टेक्नोलॉजीचा पुरेपूर आणि यथोचित वापर करत प्रेक्षकांना क्षणोक्षणी सुखद आश्चर्याचे धक्के देत एक अविस्मरणीय अनुभव देवून जाते. एखाद्या घासलेल्या कथेच पुनरुजीवन कसे होते याचे हे उदाहरण आहे. सिनेमा लेखकाला आपल्या कल्पनेशी, आपल्या सृजनशीलतेशी असा विलक्षण संघर्ष देत कथेला आकार द्यायचे असतो. अजून काही तरी नवीन करता येईल हि तहान लेखकाने सदैव जीवंत ठेवली पाहिजे. हे दुष्कर काम कसे सोपे करावे ते आपण उद्या पाहू !                      मार्च २०

कथा विश्लेषण  (story Analysis)
एक राजा होता !  त्याची एक राणी होती. त्या दोघांची एक राजकन्या होती. राजकन्या खूप सुंदर आणि हुशार होती. एकदा शिकार करतांना तिची शेजारच्या देशाच्या राजकुमारा शी अचानक भेट घडली. राजकुमार राजबिंडा आणि देखणा होता. दोघे एकमेका कडे आकर्षित झाले. दोघांमध्ये प्रेम निर्माण झाले. त्या दोघांचा विवाह ठरला. पण राक्षसाने राजकन्येला पळवून नेले. राजकुमार तिच्या शोधात निघाला. राक्षस खूप शक्तिशाली आणि जादूटोणा करणारा होता. राजकुमार त्या बलाढ्य राक्षसाशी कसा सामना करेल अशी चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली. पण राजकुमाराने आपल्या कौशल्य आणि शक्तीच्या बळावर राक्षसाचा वध केला आणि राजकन्येला सोडवून आणले. नंतर दोघांचा विवाह झाला. The End.                                      

१) ही कथा कुणाची आहे ?

अर्थात राजकुमार ची किंवा बरोबरीने राजकन्येची ! ह्यांना आपण हिरो आणि हिरोइन म्हणतो. ह्यांच्या बद्दल आपणास म्हणजे प्रेक्षकास खूप सहानुभूती असते. प्रेक्षक ह्या व्यक्तिरेखेच्या बाजूनी असतो. काहीही झाले तरी आपला हिरो जिंकला पाहिजे अशी आपल्या मनाची ओढ असते. हिरो संकटात सापडला कि आपण अस्वस्थ होतो. आणि तो संकटातून सुटला हि आपण निश्वास सोडतो. हिरो संबधी हे असं होत म्हणून खऱ्या अर्थाने हि गोष्ट त्याची असते. आपण त्यालाच नायक  म्हणतो. तर नायकाची व्याख्या अशी करता येईल-
             “ज्याच्या बद्दल प्रेक्षकांना सर्वात जास्त सहानुभूती असते आणि ज्याला काहीतरी मिळवायचे असते (प्रसंगी काहीतरी संकट दूर करावयाचे असते) त्याला नायक म्हणतात.”
नायक स्री किंवा पुरुष असू शकतो तसेच नायक एक दोन किंवा चार पाच हि असू शकतात. पण प्रेक्षकांवर सयुक्तिक प्रभाव पाडण्या  साठी एक नायक ठेवणे सोयीचे असते. ह्या व्यक्तिरेखेला कथे मध्ये अनन्य साधारण महत्व असते. त्याच्या स्वभावात दिसण्यात  बऱ्याच चांगल्या गोष्टी आणावयाच्या असतात. लेखकाला हे सार कौशल्याने करावयास हवे असते. चांगला नायक घडवतांना त्याच्यात खूप जास्त न पटणाऱ्या, न भावणाऱ्या, वास्तवापासून जरा जास्त दूर गेलेल्या गोष्टी केल्या तर तो आपला योग्य प्रभाव गमावून बसतो. हि तारेवरची कसरत जमवली पाहिजे.  ती कशी जमेल ?                                                                          

२) नायकाचे ध्येय (Want of Hero)

नायकाला (अर्थात ज्याची हि कथा आहे), काहीतरी हवे असते. त्याला हवे असलेले ते जितके मिळवावयास कठीण तितके ते मिळवण्याचे नाट्य प्रभावी होते. नायकाचे ध्येय जर खूप सर्व सामान्य असेल तर प्रेक्षकांना त्यात रोमांच ( Thrill ) जाणवणार नाही. त्याच प्रमाणे नायकाचे ध्येय जर अगदीच असाध्य (impossible )असेल तर ते प्रेक्षकांना पटणार नाही. हे खूप महत्वाचे सूत्र आहे . हा समतोल ज्या लेखकाला राखता आला तो जिंकलाच म्हणून समजा ! नायकांच ध्येय जितक आगळ वेगळ, कठीण असाध्य वाटणार पण साध्य होणार ------ हे शोधन आणि प्रभावी रीतीने दाखवण्या साठी लिहीण हा सर्वात महत्वाचा भाग चित्रपट लेखकाला जमला पाहिजे. लगान ह्या सिनेमात भुवन(आमिर खान)  ह्या व्यक्तिरेखेला लगान पासून मुक्तता हवी असते. त्यासाठी तो दुप्पट लगान ची जोखीम पत्करतो. कहाणी   मध्ये विद्या बागची (विद्या बालन) हिला तिच्या पतीची हत्या करणाऱ्या ला मारायचं असत. म्हणून ती गरोदर बनून फिरते व स्वत:चा जीव धोक्यात घालते. ह्यातून एक आणखी गोष्ट लक्षात घेण्य सारखी आहे ती अशी कि लेखकाला आपल्या नायकाला संकटात टाकावे लागते, आणि धक्का दायक रीतीने वाचवावे लागते. ह्या बद्दल आणखी सखोल विचार आपण पुढे करू.
                                                                                                                                     

३) खलनायक (Villain)

नायकाला जे काही हवे असते त्यात येणारे अडथळे म्हणजे खलनायक ! ते नैसर्गिक असू शकतात, मानवी असू शकतात, आश्चर्य असे कि स्वत: नायकाने निर्मिलेले हि असू शकतात. (त्याने केलेल्या चुका). कधी कधी नायक स्वत: खलनायक असतो किंवा होतो. उदा, हिम्मत हरवून बसलेला नायक, मग त्याला उत्साहित करण्या साठी त्याचे मित्र किंवा नायिका गाणे गाते इ. काहीतरी करून त्याच्या आत एक जोश निर्माण केला जातो. पण सहसा आपण खूप चांगल्या रीतीने ओळखतो तो नायकाला पावलो पावली नडणारा खलनायक अमरीश पुरी !
खलनायक हि प्रेक्षकांना न आवडणारी व्यक्तिरेखा असते. पण जोवर हा न आवडणारा खलनायक येत नाही तोवर प्रेक्षकांना सिनेमा अळणी वाटतो. हा खलनायक जितका नामोहरम करण्यास कठीण तितका नायकाला प्रभावी होण्यास जास्त वाव मिळतो. इथेही लेखकाच्या हातून गल्लत होते कि खलनायकाला वाईट घडवता घडवता तो इतका वाईट बनतो कि प्रेक्षकांना तो पचत नाही. म्हणजे पटत नाही. तो डेंजर असावा त्याच प्रमाणे वास्तवा पासून खूप दूर नसावा. किंबहुना खलनायक जर वास्तव वाटणारा असेल तर तो जास्त प्रभावी ठरतो. “दिल वाले दुल्हनिया ले जायेंगे “मध्ये अमरीश पुरी खलनायक म्हणून आवडत नसला तरी बाप म्हणून आवडतो. आणि शेवटी खलनायक हरल्याचा आनंद देत देत बाप हरल्याच दु:ख हि प्रेक्षकांना हेलावून जात. खल नायक नेहमी हरतोच असाही नाही. काही कथानकात तो जिंकतो सुद्धा !
खलनायक नायकाच्या विरोधात जे काही करतो ते जर नैतिकतेच्या किंवा कायद्याच्या दृष्टीने बरोबर असेल तर तो खलनायक जास्त प्रभावी ठरू शकतो. खलनायकाची बाजूही आपणास जेव्हा योग्य वाटते उदा. आपला झालेले घोर अपमान त्याचा बदला घेन्या  साठी तो खल प्रवृत्ती झाला आहे. बहुधा दोन भावांच्या कथेमध्ये असा प्रकार आढळतो. “आंखे “ मधला बँक रॉबरी करणारा मनेजर अमिताभ ! खूप बुद्धिमान खलनायक ही चित्रपटाला निश्चित उंची देतो.
आपल्या कथेच्या मर्यादा सांभाळून आपण असे काही करण्याचा प्रयत्न करावा.
एकंदर काय तर खलनायक प्रभावी असावा, म्हणजे त्याचा नायकाशी होणारा संघर्ष प्रभावी होतो     

४) सहाय्यक व्यक्तिरेखा (supporting characters)

    नायकाला हव्यासाने हवी असलेली गोष्ट मिळवण्या साठी सहाय्यक व्यक्तिरेखा त्याला मदत करतात. पण लक्षात घ्या कि व्यावहारिक जीवनात असे कुणीतरी असते का की जे फक्त दुसऱ्या कुणाला तरी मदत करतात.  त्यांना व्यक्तिश: काहीही नको असते ? उत्तर मिळेल नाही ! प्रत्येकाला स्वत:ला काहीतरी हवे असते ! नेहमी , क्षणो क्षणी, पावलो पावली ! तसेच ह्या सहाय्यक व्यक्तिरेखानाही काही तरी हवे असतेच, ते नायकाच्या ध्येयाशी मिळते जुळते असते. किंवा नायकाला जे हवे ते त्याला मिळतांना ह्यांना जे मिळेल ते त्याचे स्वत:चे ध्येय असते. समजून घ्या ते त्यांचे ध्येय असते ……… ठरते असे नव्हे ! सहाय्यक व्यक्तिरेखेच्या स्वभावाला परिस्थितीला वास्तविकतेला ते मिळते जुळते असावे. अन्यथा त्या व्यक्तीरेखे वर अन्याय होतो. आणि ती व्यक्तीरेखा (Character) प्रेक्षकांना भावत नाही. कथा अश्या ठिकाणी कमजोर होते. सहाय्यक व्यक्तिरेखा घडवतांना हा असा सर्वांगीण विचार व्हायला पाहिजे असतो. दामिनी ह्या सिनेमा तली वकील (सनी देओल) ची भूमिका त्याला दामिनी ह्या नायिकेला न्याय मिळवून देतांना स्वत:लाही समाधान मिळवायचे असते. नायकाचा संघर्ष जितका महत्वाचा तितकाच महत्वाचा सहाय्यक भामिकांचा ही असतोच.
सपोर्टिंग character हे नेहमी नायकाला मदत करणारेच असेल असा काही नियम नाही. ते नायकावर असलेल्या प्रमापोटी किंवा अन्य काही कारणामुळे नायकाला विरोध करणारेही असू शकते. उत्साहित motivate करणारेही असू शकते. विरोध करता करता अचानक मदत करणारे हि होवू शकते. हजार शक्यता असतात, लेखकाने त्या पडताळून पाहायला हव्यात.
सहाय्यक भूमिका कधी कधी खलनायकी सुद्धा असू शकते. त्यावेळी त्याच्यात खलनायकी गुण त्याच प्रमाणे असायला हवेत. पुढे व्यक्तिरेखा ची घडण ह्याबद्दल आणखी विस्ताराने विचार करू.